नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर(Nagpur Crime) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कारमधून आलेल्या 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. राकेश मिश्रा (वय 27 वर्षे) आणि रवी जयस्वाल (वय 28 वर्षे) दोघेही रा राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर अशी हल्ला करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यामधील राकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राकेश आणि रवी हे या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते.
काय घडले नेमके?
हे दोघे दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंड झाकले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.
या हल्ल्याची एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.