नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दत्तनगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराची तीन तरुणांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. आतिश ठाकरे (वय 30) (Atish Thackeray) असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरु केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आतिश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर मारपीट,चोरीसारखे 6 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. घटनेच्या वेळी रात्री उशिरा तीन अनोळखी तरुण दत्त नगर येथील शिव मंदिराजवळ बसून दारू पित होते. त्याचवेळी आतिश तेथे पोहोचला आणि त्याचा दारू प्यायला बसलेल्या आसिफ अली नावाच्या तरुणाशी वाद झाला. आरोपी आसिफचे आतिशसोबत जुने भांडण होते यापूर्वीदेखील त्यांच्यात वाद झाला होता.
हा वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी आतिशचा दगडाने ठेचून खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सकाळी मंदिरात जाणाऱ्या भाविकांना शिव मंदिराजवळ मृतदेह पडलेला दिसल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देत आरोपींचा शोध सुरू केला. यानंतर पोलिसांनी असिफ अली, बागडे आणि सोहेल या तिघांना या हत्येप्रकरणी अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.