मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं नात्यातील एका महिलेची मदत घेऊन सासू सासऱ्यासह 5 जणांना जेवणातून विष देऊन ठार मारले होते. ही घटना ताजी असताना आता मुंबईमधूनदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका सुनेने आपला पती आणि सासूची हत्या केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची जुनी मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. यादरम्यान मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध तयार झाले होते. जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला.
मृत कमलकांत शाह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कमलकांत यांना पोटात दुखत असल्याची तक्रार होती. दरम्यान त्यांना उपचारावेळी मृत्यू झाला.यावेळी कमलकांत शाह यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीसांना संशय आला. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
यानंतर शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल केला. यादरम्यान हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागच्या 10 वर्षांपासून होते अशी माहिती समोर आली. आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा त्यांनी कट रचला. कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असताना हितेश जैन आणि कविता यांनी आपला गुन्हा मान्य केला. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.