ठाणे : मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाच्या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपीने काही दिवसांपूर्वी सरस्वती वैद्य हिने 3 जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. तसंच पोलिसांचा सासेमिरा आपल्यावर लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा बनाव आरोपी आखत होता. मात्र आता पोलीस तपासात सरस्वती वैद्य हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. तिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
साने आणि सरस्वती यांच्या मोबाइलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे सानेनं तिला विष देवून, तिची हत्याकेली का? याचा तपास पोलीस करत आहेत. सोमवारी मयत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहिणींनी जे.जे. रुग्णालयातून घेतले आहेत. त्यानंतर सरस्वतीवर मुंबईतील रे रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
काय आहे नेमके प्रकरण
श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये (Mira Road Murder Case) घडले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे शिजवले, काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज सानेला (Manoj Sane) अटक केली आहे.