जालना : जालना (Jalna News) जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Jalna News) एका 30 वर्षीय महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे काल शनिवारी (26 ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शारदा शरद घनघाव मृत महिलेचे नाव आहे तर दर्शना शरद घनघाव आणि हर्षता शरद घनघाव अशी दोन चिमुकल्यांनी नावे आहेत.
अशाप्रकारे घटना आली उघडकीस?
शनिवारी सकाळपासून डोंगरगावातील लाईट गेलेली होती. त्यामुळे काय बिघाड झाला याचा शोध घेण्यासाठी गावातील विष्णू साहेबराव घनघान हे लाईनमन आणि काही ग्रामस्थांसोबत गावाकडील विद्युत ट्रॉन्सफार्मरकडे जात होते. त्यावेळी या सर्वांना गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या सर्वांनी जवळ जाऊन पाहिले असता एकूण ३ मृतदेह आढळून आले. यानंतर त्यांनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, उपनिरीक्षक शेळके हे त्यांच्या पथकासमावेत तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तीनही मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या प्रकरणी विष्णू घनघाव यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यावर रात्री उशिरा आसरखेडा येथील मयत शारदा घनघाव यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर आपल्या मुलींसह नातींचा घातपात झाला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करत आहेत.