मीरा रोड : मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात (Mira Road Murder Case) रोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा (Mira Road Murder Case) तपास करताना पोलिसांच्या हाती पीडित सरस्वती वैद्य हिच्या मोबाईलवरून महत्त्वाचा सुगावा लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सरस्वती वैद्य हिला आरोपी मनोज सानेसोबतचे प्रेमसंबंध संपवायचे होते. सरस्वती वैद्य यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सवरून ही बाब उघड झाली आहे.
काय लिहिले होते मेसेजमध्ये?
26-27 मे रोजी पीडित सरस्वती वैद्यहिने तिच्या मोबाईलवरून आरोपी मनोज सानेला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. यात लिहिलं होतं, की ‘तू माझा विश्वास तोडला आहेस… तू माझा विश्वासघात केला आहेस, म्हणून मी तुझ्याशी हे नाते संपवत आहे. सरस्वती वैद्य यांनी आरोपी मनोज सानेला हत्येच्या 7 दिवस आधी हा मेसेज पाठवला होता. या मेसेजनंतर आरोपी मनोज साने अस्वस्थ झाला होता.
या मेसेजनंतर एकाच फ्लॅटमध्ये राहात असतानाही दोघांमध्ये फार कमी बोलणं होत होतं. 26 मे रोजी सरस्वतीने आरोपी मनोज साने याला इतर महिलांसोबत चॅटिंग करताना रंगेहात पकडले. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्याच दिवशी रात्री आरोपी मनोज साने याने बेडरूममध्ये घुसून सरस्वती हिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिने त्याला बाहेर ढकलून दार बंद केलं होत. हे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर आरोपीचं चारित्र्य अत्यंत वाईट असून सरस्वती वैद्य यांना त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, हे स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे.