जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. खानदेशचे (Jalgaon Crime) ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये विद्युत वजन काट्याचा शॉक लागून एका विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी धरणगाव शहरात घडली आहे. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.
काय घडले नेमके?
घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी 4 वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परिवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी, काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या संगिता संजय पाटील यांनी घरात जाऊन पाहिले असता भारती पाटील ह्या जमिनीवर पडलेल्या होत्या.
यावेळी भारती पाटील यांच्या हातात ईलेक्ट्रीक वजन काट्याची ईलेक्ट्रीक पिन होती. विजेच्या धक्क्यामुळे भारती पाटील ह्या बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिंसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.