हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील तरुणांनी याच आरक्षणापायी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता हिंगोली जिल्ह्यातदेखील एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना इथल्या कृष्णा यशवंतराव कल्याणकर नावाच्या तरुणाने मराठा आरक्षण मिळण्यास उशीर होत असल्याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. देवजना परिसरातील एका शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेत कृष्णाने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कृष्णाच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे, मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे,असा चिठ्ठीत मजकूर लिहलेला आहे, मागील काही दिवसांपासून कृष्णा फक्त मराठा आरक्षण याबाबतच बोलत होता, असे त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे.