मुंबई : चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचं कौतुक करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत मात्र एका शास्त्रज्ञाने आत्म्हत्या (BARC Scientist Suicide) करून आपल्या आयुष्यचा शेवट केला आहे. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मनिष सोमनाथ शर्मा असं मृत शास्त्रज्ञाचं नाव आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास मनिष शर्मा यांनी आत्महत्या केली. शर्मा यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने शर्मा यांना रुग्णालयात नेलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शर्मा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? हे अद्याप समजू शकलेलं नाही.
काय घडले नेमके?
सोमवारी दुपारच्या सुमारास शर्मा यांची पत्नी आणि मुलगा हे बाहेर गेले होते. मात्र हे दोघे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी शर्मा यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर शर्मा यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने मनिष शर्मा यांना BARC रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मनीष शर्मा यांनी टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.
घटनास्थळी सापडली सुसाईड नोट ?
मी माझं आयुष्य संपवतो आहे त्यासाठी मला माफ करा अशी चिठ्ठी मनिष शर्मा यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय काम करत होते?
मनीष शर्मा यांनी 1998 मध्ये थर्मल इंजिनीअरिंगमध्ये स्पेशलायझेशनसह मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. त्यानंतर मनीष शर्मा सप्टेंबर 2000 मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये रुजू झाले. प्रगत अणुभट्ट्यांची सुरक्षा, थर्मल हायड्रॉलिक डिझाइन यामध्ये ते काम करत होते.