जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागामध्ये घडली आहे. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33 वर्ष) असे या मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचे (Heatstroke) हे पहिलेच प्रकरण आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रुपाली राजपूत (Rupali Rajput) ह्या अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. घटनेच्या दिवशी रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवार, 11 मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत आपल्या घरी अमळनेर या ठिकाणी पोहोचल्या. यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. यामुळे रूपाली यांना पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले. ही उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार करून रुपाली यांना घरी सोडले.
यानंतर रुपाली यांना थोडे बरे वाटले पण मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी त्यांना पुन्हा एकदा शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. रुपाली यांच्या माघारी पती, सासू सासरे, दीर असा परिवार आहे.