नाशिक : नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Nashik Accident) घडली आहे. यामध्ये नाशिक येथून बंगळुरु येथे भाजीपाला पोहोचवण्यासाठी जात असताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटकातील चितचोर या ठिकाणी हा अपघात (Nashik Accident) झाला आहे. गोरख रमेश पाटोळे (वय 36 वर्ष, रा. लोहशिंगवे, ता. नाशिक) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच गावातील नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत गोरख रमेश पाटोळे यांनी अडीच महिन्यांपूर्वी नवीन पिकअप घेतली होती. गावातील या दोन्ही पिकअप गाड्या एका भाजीपाला व्यापाऱ्याकडे लावल्या होत्या. मंगळवारी 20 जून रोजी या दोन्ही गाड्यांमध्ये गाजर व भाजीपाला भरून पळसे येथून निघाल्या होत्या. बंगळुरुला भरधाव वेगाने भाजीपाला नेत असताना वाहनावरील ताबा सुटल्यानंतर चितचोर (कर्नाटक) भागात रात्रीच्या सुमारास पिकअपची रस्त्याच्या डिव्हायडरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात गोरख यांचा जागीच मृत्यू झाला.
यादरम्यान पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप गाडीतील वाहन चालकाने या अपघाताची माहिती लोहशिंगवे गावातील मित्रांना व नातेवाईकांना कळविल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गोरख याचा मृतदेह लोहशिंगवे या ठिकाणी आणण्यात आला. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात (Nashik Accident) पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोरख पाटोळे यांच्या पाश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.