जालना : आजकाल जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे. याचा प्रत्यय देणारी घटना जालनामध्ये (Jalna News) उघडकीस आली आहे. यामध्ये (Jalna News) एका तरुणाने अवघ्या 22 व्या वर्षी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्याने “मी मेल्यावर तू रडशील का?” असा प्रश्न व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारत तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
विलास मोरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो तीर्थपुरी येथे चहाचे हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. विलासने काल, रविवार दि. 27 रोजी रांजणी येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. होतकरू तरुणाने अचानक अशी टोकाची भूमिका का घेतली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धक्कादायक म्हणजे त्याने मृत्यूपूर्वी स्वतःच्या व्हॉटसअप स्टेटसवर “जीने से ज्यादा मरने मे विश्वास है” व “मी मेल्यावर तू रडशील का?” असे दोन स्टेटस व स्वतःचा फोटो ठेवले होते. विलास हा अत्यंत उमदा व होतकरू तरुण होता.तसेच तो मनमिळावू स्वभावाचा होता. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र समजू शकलेले नाही? मात्र त्याच्या स्टेटसवरून हे प्रेमप्रकरण असावे अशी चर्चा रंगली आहे. या घटनेची घनसावंगी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.