जळगाव : राज्यात सध्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गिरधर खिलचंद नेहते हे जळगावमधील यावल तालुक्यातील न्हावी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी गिरधर नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यावेळी कोणीही नसल्याने त्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अशा प्रकारे झाला खुलासा
बराच वेळ झाला तरी गिरधर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी गिरधर यांचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर याची महिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ग्रामस्थांच्या मतदीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ मोहीनी भुगवाडया यांनी गिरधन यास तपासून मृत घोषित केले. मृत गिरधर यांच्या माघारी वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बऱ्हाटे करीत आहे.