जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 13 मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. अश्विनी गुलाब भामरे (Ashwini Gulab Bhamre) असे मृत तरुणीचे नाव आहे. 16 एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. मात्र काळाने अश्विनीचा संसार फुलण्यागोदर घाला घातला आहे. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी 13 एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच 19 बीजे 8996 या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. तर अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन त्याच्या रिक्षासोबत निघाले.
यादरम्यान मेहेरगाव फाट्याजवळ आले असताना एमएच 19 बीजे 1405 या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला.अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील रेखाबाई पाटील (Rekhabai Patil) आणि वर्षा हर्षल बोरसे (Varsha Harshal Borse) हे दोन्ही जखमी झाले होते. यानंतर रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात अश्विनीला मृत घोषित करण्यात आले. मृत अश्विनीच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. हेडकॉन्स्टेबल संजय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.