बीड : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे (Reservation Protest) पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता बीडमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
राजु बंडू चव्हाण (वय 31) आणि सोनाली राजु चव्हाण (वय 28) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी राहतात. सध्या जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरू आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते.
यानंतर राजू यांच्या मनात अचानक काहीतरी आले आणि त्यांनी उपोषणस्थळापासून पंधरा फुटाच्या अंतरावर असलेल्या आपल्या घरी जाऊन बायकोसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तलवाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.