नंदुरबार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. आज सकाळी मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना ताजी असताना आता नंदुरबारमधून (Nandurbar) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदशैली घाटात (Chandshaili Ghat) हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काय घडले नेमके?
धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदशैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी असे अपघात या ठिकाणी घडत असतात. याच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात पिकअप वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातावरून खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे, असा संतप्त सवाल विचारत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.