हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी जाणे 2 जणांना महागात पडलं आहे. या दोघांचा रस्ते अपघाता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपतीच्या दर्शनासाठी पायी जात असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन भाविक जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कसा घडला अपघात?
आखाडा बाळापुर ते वारंगा या मार्गावर दाती फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. संकष्टी चतुर्थीनिमित्त सत्य गणपतीला पायी दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांना अज्ञात वाहनाने चिरडले. यात दोन भविकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. दयानंद निर्मल (35), गजानन काळे (36) अशी मृतांची नावे आहेत.
हदगाव तालुक्यातील मरडगा येथील दयानंद निर्मल, गजानन काळे, पांडुरंग काळे, महेश झांबरे, सखाराम शिंदे हे पाच भाविक चतुर्थी निमित्त सत्य गणपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी रात्री भोकर फाटा येथील सत्य गणपतीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. मरडगा येथून रात्री पाचजण आखाडा बाळापूर मार्गे सर्वजण निघाले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर दातीफाटा येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने पाचही भाविकांना जोरदार धडक दिली. यामध्ये दयानंद निर्मल, गजानन काळे या भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी तिघेजण जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार प्रभाकर भोंग, मधुकर नांगरे, नागोराव बाबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी तातडीने जखमींना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्रथामिक उपचार देऊन नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.