रत्नागिरी : लहान मुले बाहेर खेळताना (Ratnagiri News) किंवा घरातही खेळताना त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा तुमचे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावरदेखील बेतू शकते.अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात संगमेश्वर तालुक्यात वांद्री येथे घडली आहे. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने ३ वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने किंजळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय घडले नेमके?
ओवी अमर किंजले असे या तीन वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. ओवी ही त्यांच्या शेजारी राहणारी आरती अनंत किंजळे यांच्या घरी लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी खेळता खेळता तिच्या अंगावर गरम पाणी पडले. यामुळे ती भाजली होती. शेजाऱ्यांनी आणि घरच्यांनी तिला तात्काळ संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला तात्काळ रत्नागिरी येथील निर्मल बाल रुणालय साळवी स्टॉप, येथे औषधोपचाराकरीता दाखल करण्यात आलं होतं.
यानंतर तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेण्यास सांगितले. त्यामुळे तिला 11 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात औषधोपचारापूर्वीच दुर्दैवाने तिचा मृत्यू झाल्याचे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. ओवीच्या अश्या दुर्दैवी मृत्यूने वांद्री परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या मृत्यू प्रकरणाची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.