जालना : जालना (Jalna News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. बदनापूर परिसरातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला आहे. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना समोरून येणाऱ्या टॅक्टरनं दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय 38) त्यांचा मुलगा युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय 13 वर्ष) आणि आत्मराम कारभारी मस्के (वय30 वर्ष ) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
काय घडले नेमके?
हा अपघात बदनापूर परिसरात घडला आहे. हे तिघेही दुचाकीवर प्रवास करत होते. पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताच अचानक समोरून आलेल्या टॅक्टरनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये दुचाकीचाही पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
ट्रॅक्टरचालक फरार
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थवरून फरार झाला आहे. या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे. या अपघातात ज्ञानेश्वर आणि युवराज या बाप – लेकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.