औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करत आपले जीवन संपवले आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे संपूर्ण औरंगाबाद जिल्हात खळबळ उडाली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
पहिली घटना
कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिनकर बिडवे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
दुसरी घटना
पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान पीरबावडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. तर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी पीरबावडा येथे संध्याकाळी झाला आहे. या विषयी वडोद बाजार पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना
पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांच्याही शेतातील पिके करपून गेली आहे. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे भाऊ संतोष साहेबराव मतसागर यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.