अहमदनगर : अहमदनगर जिल्हयामधील दुहेरी हत्याकांडाने (Double Murder Case) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये (Double Murder Case) कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पत्नी नूतन सागर साबळे (वय 23 वर्षे), तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय 45 वर्षे) अशी मृत सासू – सुनांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे राहुरीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामधे 15 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावई सागर सुरेश साबळे याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडानंतर आरोपी सागर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अशी उघडकीस आली घटना
मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या मृत नयन यांच्या भावाला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. जेव्हा ते आपल्या बहिणीच्या घरी आले तेव्हा दोन्ही मृतदेह (बहीण आणि आई) रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर त्याने या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली. या हत्याकांडाची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, पोलीस उप निरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.आणि त्यांनी आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली. या प्रकरणी गंगाधर भास्कर टेमक (राहणार करजगाव ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश साबळे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 907/23 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.