नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एका 16 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये आरोपीने तिच्यावर 20 वेळा वार केले होते. दिल्लीतील शाहबादमधील जेजे कॉलनीतील तिच्या घराबाहेर तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या हत्येनंतर आरोपी घटनास्थावरून फरार झाला होता. त्याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
फोन केला होता बंद
या आरोपी तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये, आपला फोन ट्रेस होऊ नये म्हणून आपला फोन बंद करून ठेवला होता. यानंतर तो त्याच्या आत्याच्या घरी जाऊन लपला असल्याची माहिती बुलंदशहराचे अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बजरंगबली चौरसिया यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून साहिलला पहासू पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या अटरेना गावामधून अटक केली.
निर्घृणपणे हल्ला
हत्या करण्यात आलेल्या मुलीचे आणि साहिलचे प्रेमसंबंध होते. मात्र शनिवारी त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. यानंतर ती मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपीने तिला गर्दीच्या ठिकाणी गाठले आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. साहिलने या तरुणीला एका भिंतीवर ढकललं आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने 40 वेळा वार केले. यानंतर जवळच पडलेला मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
त्या एका फोनमुळे त्याला अटक
मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साहिलच्या घरी छापा टाकला. मात्र तो त्या ठिकाणाहून फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी साहिल कुठे गेला आहे यासंदर्भात चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी माझ्या बहिणीने मला फोन करुन साहिल इकडे बुलंदशहरमध्ये माझ्या घरी अचानक आल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी या माहितीच्या आधारे बुलंदशहरमध्ये जाऊन त्याच्या आत्याच्या घरून त्याला अटक केली. त्याला कलम 302 अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.