अहमदनगर : काल छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) शेवगाव (Shevgaon) शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक (Stone Throwing) करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटाकडून दुकानांचं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांना हा जमावाला आटोक्यात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. या सगळ्या गोंधळादरम्यान 4 पोलीस जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
काल छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पळापळ झाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अकोल्यानंतर शेवगावमध्ये मिरवणुकीदरम्यान उसळली दंगल; गाड्यांची केली तोडफोड pic.twitter.com/ja0qW51Z2I
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 15, 2023
यावेळी या जमावाने काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांना हा जमाव पांगवण्यात यश आले. यानंतर सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आले असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे त्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.