चंद्रपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण (Chandrapur Accident News) वाढतच चालले आहे. या अपघातांमध्ये मृत पावलेल्या लोकांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. ट्रक आणि ऑटोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मेन महामार्गावर हा अपघात झाल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.