चंद्रपूर : चंद्रपूरमधून (Chandrapur Accident Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Chandrapur Accident Crime) ट्रकनं धडक दिल्याने धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामध्ये पती- पत्नी आणि त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच ट्रकने पुढे जाऊन दोघांना परत धडक दिली. त्यामध्ये आणखी दोघे गंभीरित्या जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे.
निलेश वैद्य (32 वर्ष) रुपाली वैद्य (26 वर्ष), मधू वैद्य (3 वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्रशाद टगराफ (33 वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (40 वर्ष) हे दोघेजण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही गर्दी नियंत्रणात आणली.
काय घडले नेमके?
राजुरा तालुक्यातील धोपटाला येथील गुरुदेव नगर येथे वास्तव्यास असलेले निलेश वैद्य आपल्या पत्नी आणि मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी काम आटपून घरी परत येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा येथून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याच ट्रकने पुढे जाऊन आणखी 2 बाइकस्वारांना धडक दिली. या धडकेत रामपूर येथील दोघेही जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि आरोपी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.