रत्नागिरी : रत्नागिरीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये बुधवारी मध्यरात्री रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक पेट (Bus Fire) घेतला. या खासगी बसमध्ये सर्वजण गाढ झोपले असताना मध्यरात्री बसच्या टायरने अचानक पेट घेतला.यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काय घडले नेमके?
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री 1.45 वाजता बसमध्ये सर्वजण गाढ झोपले असताना बसला अचानक आग लागली. धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसने एकूण 19 प्रवासी प्रवास करत होते. एका तरुणाच्या प्रसंगावधामुळे बसमधील प्रवासी सुखरुप बचावले. हा तरुण मुंबईत शिक्षण घेणाऱ्या आर्यन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याने दाखवलेल्या प्रसगांवधानामुळे बसमधील 19 प्रवासी, दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.
8 वर्षांपूर्वीदेखील अशीच घटना घडली
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला 8 वर्ष झाले आहेत. त्या रात्री मुसळधार पावसामुळे सावित्री नदीनं रौद्र रुप धारण केलं होतं आणि त्यामुळे सावित्री नदीवर असणारा मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेला होता. यात जवळपास 40 जणांना जलसमाधी मिळाली होती. तब्बल 13 दिवसांच्या शोधकार्यानंतर वाहनांच्या सांगाड्यासह 30 जणांचे मृतदेह हाती लागले होते.