गुहागर : देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) मिरवणूका पार पडत आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये रत्नागिरीमधील गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो गर्दीमध्ये घुसला. या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 गणेशभक्त जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुहागरमधील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन दरम्यान मिरवणुकीत ही दुर्घटना घडली आहे. दीपक भुवड आणि कोमल भुवड (वय 17) अशी मृतांची नावं आहे.
आगर इथं सार्वजनिक गणरायाला वाजत गाजत निरोप दिला जात होता. रस्त्याच्या बाजूने मोठ्या संख्येनं तरुण आणि तरुणी ढोल ताशाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. गणरायाची विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे जात होती. पण अचानक एक टेम्पो मिरवणुकीत घुसला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे.याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.