भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत भिवंडीत चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडीतील शांतीनगर परिसरात के जी एन चौकामध्ये ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीतुन हा हल्ला करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबरमध्ये दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे काही काळ शांतीनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका गटाने चाकू हल्ला केला. इतकंच नाही तर बांबूने बेदम मारहाण केली गेली. चाकू हल्ल्यानंतर तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिकांनी त्यांना उचलून रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले.
या हल्ल्यात जुबेर शोएब शेख (वय 46), इस्तियाक शोएब शेख (वय 32), अबू हमजा शेख, आसिफ वहाब शेख (वय 36), साजिद वहाब शेख (वय 33), शेहबाज सोहेल शेख (वय 34), नोयेब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. तर जुबेर शोएब शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.