पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना काल घडली. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काय घडले नेमके?
वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आक्रमकपणे वारकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला.यानंतर पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेवरून आता राजकारण पेटले आहे.
शिंदे फडवणीस सरकारचा खोटारडेपणा उघड..#वारीहल्ला pic.twitter.com/juBjMbC1TN
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2023
ही घटना अत्यंत चीड आणणारी असून या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. भागवत धर्माची पताका घेऊन चालणाऱ्या आणि अत्यंत शांततेत भक्तीमार्गाचे आचरण करणाऱ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा खूप मोठा अवमान आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती! अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? शासनाने तातडीने याची दखल घेऊन हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
या प्रकरणी तरुण वारकरी विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर कोणताही लाठीमार झाला नसून, केवळ झटापट झाल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. मात्र तरुण वारकरी विशाल पाटील यांनी पोलिसांचा हा दावा खोडत आपल्या अंगावर झालेल्या जखमा दाखवल्या आहेत. तसंच आम्हा चार वारकऱ्यांना पोलिसांनी बाजूच्या एका घरात नेऊन मारहाण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले ‘मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. जळगाव येथील राहणारा आहे. आम्ही पालखीला दरववर्षी येतो. आम्हाला प्रस्थान सोहळ्याला दरवर्षी सोडतात. मात्र पोलिसांचं अचानक ठरलं की, आम्हाला आत सोडायचं नाही. आम्हा चार वारकऱ्यांना २० पोलिसांनी मारहाण केली. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवरही ते हात उचलू शकतात. पोलिसांनी आम्हाला मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं,’ अशा शब्दांत या तरुण वारकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे.