जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद (Nasirabad) येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. रविंद्र राजाराम पाटील (वय 52, रा. नशिराबाद, ता. जळगाव) (Ravindra Rajaram Patil) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
रविंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह नशिराबाद येथे खालची आळी भागात राहत होते. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. रविंद्र पाटील यांची नशिराबादसह जळगाव तालुक्यात एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. बुधवारी रविंद्र पाटील हे एकटेच घरी होते, पत्नी व मुलगा कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यादरम्यान रविंद्र पाटील यांनी घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी घराबाहेर गेलेला मुलगा जेव्हा घरी जेवणासाठी आला तेव्हा त्याला वडील रविंद्र पाटील यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. यानंतर त्याने वडिलांचा मृतदेह पाहून मोठा आक्रोश केला. त्याचा हा आक्रोश पाहून आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन रविंद्र पाटील यांचा मृतदेह खाली उतरवला. घटनेची माहिती मिळाल्यावर नशीराबाद पोलिसांनी (Naseerabad Police) घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयता हलविला. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख (Dr. Niranjan Deshmukh) यांनी रविंद्र पाटील यांना तपासून मृत घोषित केले. मृत रविंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.