सातारा : सातारा (Satara Crime News) आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून कराड (Satara Crime News) तालुक्यातील ओगलेवाडीच्या एका युवकाने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. दरम्यान,या तरुणाचा मृतदेह आज सारोळा पुलापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर प्रवाहामध्ये मिळून आला. निलेश महादेव काकडे (वय 40, रा. ओगलेवाडी, ता. कराड, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
काय घडले नेमके?
निलेशने मंगळवारी नीरा नदीच्या पुलावर आपली दुचाकी लावून नदीपात्रात उडी घेतली होती. पुलावर मिळालेल्या गाडीवरून संबंधिताने नदीत आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम महाबळेश्वर, शिरवळ रेस्क्यू टीम यांच्याकडून गुरुवारी (दि. 10) सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासून ही शोध मोहीम शर्थीने राबवली जात होती.
अखेर काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुलापासून पुढे जवळपास 15 किलोमीटर अंतरावर राजापूर स्मशानभूमीजवळ नदीच्या प्रवाहात निलेश काकडेचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळपासून ही मोहीम राबवली जात असताना नीलेश यांचे नातेवाईकदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दुःख, अस्वस्थता आणि खिन्नतेने ते हताश झाले होते. मृतदेह मिळून आल्यानंतर मात्र त्यांनी हंबरडा फोडला. शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.