नवी मुंबई : नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिकेतील उद्यानातील बेंच अंगावर पडून (Navi Mumbai) एका 4 वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. खारघर सेक्टर-12 येथील उद्यानात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पनवेल पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
गिरीराज सोसायटी प्लॉट नंबर 36 येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असलेल्या प्रकाश विश्वकर्मा यांची मुलगी ब्रीजा ही आपल्या वडिलांसोबत खारघर येथील उद्यानात खेळायला गेली होती.ब्रीजा खेळत असताना तिचे वडील एका बेंचवर बसले होते. खेळता खेळता ब्रीजाला दम लागल्याने ती तिथेच एका बेंचवर बसण्याकरता गेली. परंतु बेंच नादुरुस्त आणि बिघडलेला असल्याने तोच बेंच ब्रीजाच्या अंगावर पडला.
यानंतर मुलीच्या अंगावर बेंच पडलेला पाहून ब्रीजाच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ आपल्या मुलीच्या दिशेने धाव घेतली. यानंतर त्यांनी वडिलांनी कसेबसे ताकतीने बेंच उचलून बाजूला केला. परंतु, अंगावर पडलेल्या बेंचच्या भारी वजनामुळे ब्रीजाचा जागीच मृत्यू झाला. आपल्या 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.