महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता थेट उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत आभारही मानले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये मशिद आणि मंदिरांवरील भोंग्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे. त्यावरुन अनेक मंदिर, मशिदींवरील भोंगे उतरविले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ याची देशभर चर्चा आहे. महाराष्ट्रातही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेमुळे ते राज्यासह देशभरात चर्चेत आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे या चर्चेत आता भर पडली आहे. तसेच, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ”उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाविकासाघाडीतून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022