रायगड : मागच्या काही दिवसांपासून कोकणातील (Raghuvir Ghat Kokan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं कोकणातील अनेक नद्यांना पूर आला आहे. यादरम्यान काल इर्शाळवाडी दुर्घटना घडली. यामध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच आता कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा रघुवीर घाट (Raghuvir Ghat Kokan) वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने रघुवीर घाटावर गर्दी करत असतात. त्यामुळं पाऊस सुरू असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय खेडच्या तहसीलदारांनी घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
रघुवीर घाट (Raghuvir Ghat Kokan) हा डोंगर भागालगत असल्याने तिथं दरड कोसळणे किंवा भूस्खलन होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच हवामान खात्याने कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं कोकणाला पुण्याशी जोडणाऱ्या मार्गावर कोणताही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट बंद करण्यात आला आहे.