मुंबई : सरकारी शळांमधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणार्या शिक्षकांच्या बदल्या यापुढे होणार नाहीत अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे. मात्र शिक्षकांच्या विनंती अर्जानुसार किंवा शिक्षकांच्या तक्रारी आल्यास त्यांची तत्काळ बदली करण्यात येईल असेदेखील दीपक केसरकर म्हणाले आहेत.
तसेच परीक्षा घेतलेल्या 30 हजार शिक्षकांच्या लवकरच नेमणुका करणार असल्याची माहितीदेखील केसरकर यांनी दिली आहे. जी-20 समिट अंतर्गत शिक्षणाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकार यजमानपदाची भूमिका पार पाडत आहे. ही बैठक 19 ते 22 जून दरम्यान पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात पार पडणार आहे. माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली.
शिक्षक भरतीसाठी यापूर्वी परीक्षा घेतलेल्या शिक्षकांच्या लवकरच नेमणुका करण्यात येणार आहे. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून संच मान्यतेनंतर त्यांना नेमणुका देण्यात येतील, असेदेखील दीपक केसरकर म्हणाले आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसोबतच आता शूज आणि मोजेही मोफत देणार असून याबाबतचा निर्णय लवकरच घेणार आहे. शाळांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणार असल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.