मुंबई : मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport Shut) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी 11 ते 5 या वेळेत बंद केलं जाईल, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे.
‘या’ कारणामुळे राहणार बंद?
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंदर्भात एअरमेनला नोटीस एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे.