दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारने दिल्ली सरकारविरुद्ध वटहुकूम काढला असून राज्यसभेत हा वटहुकूम मंजूर झाला नाही तर २०२४ मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही असे भाकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल म्हणाले, “मोदी सरकारने आम्हा सर्वांची शक्ती काढून घेतली. ज्या दिवशी निकाल आला त्याच्या 8 दिवसात अध्यादेश जारी केला आणि अधिकार काढून घेण्यात आले. मोदी सरकार लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाही. आम्ही करू तेच, अशा अविर्भावात, गर्वाने वागत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय काहीही निर्णय देऊ देत आम्ही मानणार नाही असा मोदींचा स्वभाव आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना शिव्या दिल्या जातात आणि त्यांच्याविरोधात मोहीम चालवली जाते असंही केजरीवाल यांनी म्हटलं. शिवसेना सगळ्यात जास्त सहन करत आहे. सीबीआय, ईडीचा वापर करून बहुमत, लोकांचं सरकार त्यांनी पाडलं. जर सरकार बनलं नाही तर मग आमदार तोडायचे, अध्यादेश काढायचे हाच प्रयत्न आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही मातोश्रीवर आले होते. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ते भेटणार आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले ते नातं जपणारे आहेत, तर आम्हीही नातं टिकवणारे आहोत. आम्हाला त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानलं, आम्हीही त्यांच्यासमवेतची ही दोस्ती शेवटपर्यंत कायम ठेवू, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना आणि आप एकमेकांचे मित्र असल्याचे म्हटले. केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विरोधक एकत्र येत आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.