विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. १२ पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध होईल.
विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन तर, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आजघडीला ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने विधान परिषद निवडणुकीची शक्यता वाढली आहे.