मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 70वर्षांचे होते.
प्रा. हरी नरके यांच्याविषयी
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादन, डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले आहे.
महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.