नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग प्रकरणात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमली आहे.
या समितीत संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी असावेत अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोब झालेल्या बैठकीत केली होती. या समितीत डॉ. अजित नवले यांचाही समावेश असावा याबाबत आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे आणि कॉम्रेड जे. पी. गावित यांनी मुख्य सचिवांना सांगितले होते. मात्र, अजित नवले यांचा समितीत समावेश करण्यात आला नाही.
सुरूवातीला किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावित व आ. विनोद निकोले हे समितीत असावेत, असे गावित यांनी सुचविले होते. परंतु मतदारसंघातील कामांमुळे मला समितीत वेळ देता येणार नसल्याने व डॉ. अजित नवले यांचा शेतकरी प्रश्नांबद्दल सातत्याचा पाठपुरावा असल्याने त्यांना समितीत घ्यावे, अशी लगेचच विनोद निकोले यांनी सूचना केली.
विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे व कॉम्रेड जे.पी.गावीत यांनी लगेचच डॉ. अजित नवले यांचे नाव समितीत असावे असे मुख्य सचिव यांना एकमताने व तत्काळ सांगितले.
मला समितीतून काढू शकता शेतकऱ्यांच्या हृदयातून नाही
दरम्यान या समितीतून नाव वगळल्यानंतर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी मला समितीतून काढू शकाल,शेतकऱ्यांच्या हृदयातून नाही ! अशी प्रतिक्रिया दिली आहे.