टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.
ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. यामुळे संपूर्ण आळंदी गजबजली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दिव्यांची रोषणाई केली असल्यामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगत आहे. तिथे सुरू असलेली भाविकांची लगबग या सौंदर्यात भर टाकत असल्याचे चित्र आहे. हरिनामाचा अखंड गजर होत आहे.
पालखी प्रस्थानाआधी मुख्य मंदिरात मानाच्या 47 दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. आज संध्याकाळी 4 वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होईल. श्री गुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती केली जाईल. त्यानंतर संस्थानतर्फे आरती म्हणण्यात येईल. नारळप्रसाद, विधीवत मानपानाचा कार्यक्रम होणार आहे. माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. वीणा मंडपात श्रींच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मानकऱ्यांना पगड्यांचे वाटप होणार आहे. नंतर महाद्वारातून पालखी प्रस्थान होईल. ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने आजोळघरी मुक्कामासाठी जाणार आहे.