मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे.
गृहमंत्र्यांनी चांदीवाल आयोगाचा 201 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला आहे. अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे. मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दरमहिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप पत्रातून करण्यात आला होता.
या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चांदिवाल आयोगाचा अहवाल अनिल देशमुख यांच्यासाठी सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. यानंतर देशमुखांना क्लिनलिट मिळणार का, हे आता पाहावे लागणार आहे.