ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane News) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 3 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी 10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नुतनीकरणासाठी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे.अशातच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.