मुंबई : पोलीस सूचनांचं पालन न केल्याने आज अर्नाळा समुद्रकिनारी Arnala मोठी दुर्घटना Accident घडली आहे. या घटनेमध्ये चार मुलं बुडाली होती. यातील दोघा जणांना वाचवण्यात आत्तापर्यंत यश आल आहे. मात्र दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास चार मुलं समुद्रात खेळण्यासाठी आली होती. दरम्यान 30 सप्टेंबर पर्यंत अर्नाळा समुद्रकिनारी पाण्यात उतरण्यास बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यावेळी येथील पोलीस अंमलदार यांनी या मुलांना समुद्रात उतरू नये अशी तंबी दिली होती. परंतु तरीही पोलीस पथक निघून गेल्यानंतर ही चारही मुलं समुद्राच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरली आणि काही वेळातच ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.
या मुलांनी पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच वाचवण्यासाठी म्हणून आवाज द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी तत्परतेने या मुलांना वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले आहेत. या चार मुलांपैकी दोघा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.