Indrayani River Flood : पूरपरिस्थितीत अडकलेल्या 408 भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू - टॉप न्यूज मराठी

आळंदी : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच  (NDRF) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरी येथून 100, ठाकूरबुवा मंडप येथून 60 आणि गोपाळपुरा येथून 28 अशा एकूण 408 भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील 150 गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.