पुणे : देशभरात पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 चे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अनेक राज्यांमधून नवे रुग्ण समोर येत आहेत. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त का होतो? पाऊस आणि स्वाइन फ्लूचा थेट संबंध काय आहे? हा आजार किती धोकादायक आहे आणि सामान्य सर्दी-तापापेक्षा तो कसा वेगळा आहे, जाणून घेऊया.
बीएलके मॅक्स हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. राजिंद्र कुमार सिंघल यांच्या मते, पावसाळ्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची 3 मुख्य कारणे आहेत:
1. हवेतील आर्द्रता वाढते
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता 80 ते 90% पर्यंत पोहोचते. अशा ओलसर वातावरणात H1N1 व्हायरसचे थेंब हवेत आणि टेबल, दरवाजे, लिफ्टच्या बटणांसारख्या पृष्ठभागांवर तासन्तास जिवंत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
2. थंड तापमान
तापमान कमी झाल्यामुळे हा विषाणू अधिक वेगाने वाढतो आणि पसरतो.
3. बंदिस्त जागा
पावसापासून बचावासाठी लोक घर, ऑफिस, शाळा आणि मेट्रोमध्ये खिडक्या बंद करून एकत्र बसतात. योग्य हवा खेळती न राहिल्याने एका रुग्णाच्या शिंकण्याने किंवा खोकण्याने संपूर्ण खोलीत संसर्ग पसरू शकतो.
बहुतांश निरोगी लोकांमध्ये हा आजार 5 ते 7 दिवसांत बरा होतो. मात्र खालील लोकांसाठी हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यांनी विशेष काळजी घ्यावी:
1. 5 वर्षांपेक्षा लहान मुले
2. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
3. मधुमेह, हृदयरोग असले रुग्ण
4. दमा, TB सारखे श्वसनाचे आजार असलेले रुग्ण
5. गर्भवती महिला
पावसाळ्यात स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी करा:
1. स्वच्छता आणि मास्क
साबणाने 20 सेकंद हात धुवा. गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये जाताना मास्क लावा.
2. लसीकरण करून घ्या
उच्च जोखीम असलेल्या गटातील लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लूची लस अवश्य घ्यावी. लस 1 वर्षापर्यंत संरक्षण देते.
3. स्वतः औषधं घेऊ नका
तापासाठी पॅरासिटामॉल व्यतिरिक्त इतर कोणतेही अँटिबायोटिक किंवा अँटीव्हायरल औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
4. सुरक्षित अंतर ठेवा
खोकला-ताप असलेल्या व्यक्तीपासून 1 मीटर अंतर ठेवा.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उकळलेले पाणी प्या, ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा. लक्षणे दिसताच 24 तासांच्या आत तपासणी करून घ्या.
कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.