Agriculture Minister Datta Bharane : राज्यात 84% पेरणी पूर्ण, खताचा तुटवडा नाही; कृषी मंत्री दत्ता भरणे यांची घोषणा, 85 कंपन्यांवर कारवाई - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याची मोठी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली. यंदा मॉन्सून जूनमध्ये उशिराने आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पेरणीचा वेग वाढला. त्यात मका आणि सूर्यफुलाची पेरणी सर्वाधिक झाल्याचे भरणे यांनी सांगितले.  कृषी 

कृषी मंत्री म्हणाले, "राज्यात खताचा साठा मागणीप्रमाणे उपलब्ध आहे. कुठेही तुटवडा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांना जी मदत करता येईल ती राज्य सरकार करत आहे. कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे."

अजून काही भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यावेळी भरणे यांनी राज्य सरकारच्या महत्वाच्या योजनांची माहितीही दिली. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. तसेच बनावट आणि निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित बियाणे बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जून महिन्यात एल निनोच्या संकटामुळे पाऊस कमी झाला होता. परंतु जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.