अर्थकारण : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास 10 ते 12 टक्क्यांनी खाली आला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार घाबरले आहेत आणि त्यांनी आपली एसआयपी बंद करण्यास सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात जवळपास 40 लाखांहून अधिक एसआयपी बंद झाल्या आहेत. पण बाजार पडत असताना एसआयपी बंद करणे योग्य आहे का.
आर्थिक तज्ञांच्या मते एसआयपी बंद करणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. एसआयपीचा खरा फायदा हा बाजार पडतो तेव्हाच होतो. याला रुपी कॉस्ट एव्हरेजिंग असे म्हणतात. बाजार वर असताना तुम्हाला कमी युनिट मिळतात पण बाजार खाली आल्यावर त्याच पैशात तुम्हाला जास्त युनिट मिळतात. जेव्हा बाजार पुन्हा वर जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. जर तुम्ही घाबरून एसआयपी बंद केली तर तुम्ही तो फायदा गमावून बसाल.
याशिवाय अनेकजण एसआयपी बंद करून पैसे काढून घेत आहेत. पण हा तोटा बुक करण्यासारखा आहे. जोपर्यंत तुम्ही युनिट विकत नाही तोपर्यंत तो फक्त कागदावरचा तोटा असतो. बाजार नेहमी वर खाली होत असतो. 2008, 2020 मध्ये देखील बाजार 40 टक्क्यांनी पडला होता पण ज्यांनी एसआयपी चालू ठेवली त्यांना पुढच्या दोन वर्षात दुप्पट परतावा मिळाला.