चाकण-तळेगाव औद्योगिक वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय; 31 ऑगस्टपर्यंत रस्ते, पार्किंग आणि अतिक्रमण हटवण्याची मुदत - टॉप न्यूज मराठी

पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून वाढणारी वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या समस्येवर आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या सर्व समस्या 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सोडवण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पीएमआरडीएचे अभिजीत चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणकोणते निर्णय झाले?

1. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती 

औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते आणि या भागातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग यांची खड्डे बुजवणे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. खराब रस्त्यांमुळे अपघात आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हे काम प्राधान्याने करण्यास सांगितले आहे.

2. कंपन्यांना पार्किंग बंधनकारक

सार्वजनिक रस्त्यांवर होणारी अनधिकृत पार्किंग ही कोंडीचे मोठे कारण आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आपल्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक आहे. यामुळे रस्ते मोकळे राहून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

3. अतिक्रमणांवर कारवाई

औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, नाले आणि पदपथांवरील अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे हटवावीत. यामुळे पाणी तुंबणे आणि वाहतुकीला होणारा अडथळा कमी होईल.

4. नियोजनबद्ध विकास आराखडा

चाकण आणि तळेगाव परिसराचा भविष्यातील वाढ लक्षात घेऊन नगररचना विभागामार्फत परिसराचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे नियोजन केले जाईल.

31 ऑगस्ट ही अंतिम मुदत

औद्योगिक क्षेत्रात दररोज हजारो कामगार आणि मालवाहू वाहने ये-जा करतात. रस्त्यांची दुरावस्था आणि पार्किंगच्या अभावामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि दिलेल्या मुदतीत सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे चाकण-तळेगाव परिसरातील हजारो कंपन्यांना आणि कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.