आदिवासी विकास विभाग : अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार; 204 आश्रमशाळांमधील 79 हजार 624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून विभागामार्फत राज्यभरात 'अॅनिमिया निवारण कार्यक्रम' युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी कळविली आहे. 

या मोहिमेअंतर्गत अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५,८६८ तर ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२,४२० तसेच ६ एकलव्य शाळांमधील १,३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 'सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स' (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे. या मोहिमेत ३७,९१९ विद्यार्थ्यांचे तर ४१,७०५ विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. नाशिक विभागातील १०४ शाळांमधील एकूण ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१,३९३ तर २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९२२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

ठाणे विभागातील ८१ शाळांममधील एकूण ३३,४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२,०५४ तर, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १०,८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २,८९८ आणि १,८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १,८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या १,०१३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १,२९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

दरम्यान, या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले, त्यांना पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही श्रीमती बनसोड यांनी कळविले आहे.